Monday 23 November 2015

Thursday, 9 August 2012

रुग्णालयांनी अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करावा - डॉ. विजयकुमार गावित


मुंबई, दि. 9 : वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये राज्य शासनाने मनुष्यबळ, पायाभूत सुविधा व उच्च दर्जाची साधन सामुग्रीची तरतूद केली आहे. रुग्णालयांनीही अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी काल येथे सांगितले.
            कामा व ऑल्ब्लेस रुग्णालय, मुंबई येथील मुख्य प्रवेशद्वार, संरक्षण भिंत, सेप्टीक ओटी, बाह्यरुग्ण विभाग, लेबर वॉर्ड, सभागृह, हृदयरोग रुग्णवाहिका यांचा लोकार्पण व अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
            डॉ. गावित पुढे म्हणाले राजीव गांधी जीवनदायी योजना अतिशय परिणामकारकरित्या जिल्हयांमध्ये कार्यान्वित झाली असून जे.जे. रुग्णालयातून या योजनेचा लाभ घेतलेल्या सर्वाधिक व्यक्ती आहेत.
            वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत यावेळी म्हणाले की, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे अंमलबजावणी झाली आहे. जास्तीत जास्त चांगली आरोग्य सेवा या योजनेंतर्गत देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील.
जे.जे. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यावेळी म्हणाले कामा रुग्णालय फक्त महिला व बालकांसाठी आहे तेथे पुरुषांनाही प्रवेश देण्याचा विचार वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत करण्यात यावा. जवळजवळ 40 कोटी रुपयांची यंत्र सामग्री तेथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नजीकच्या काळात कर्करोगावर प्रभावी उपचार करणारे रुग्णालय म्हणून कामा रुग्णालयाची ओळख निर्माण होईल.
 कामा रुग्णालयाच्या अधिक्षक  डॉ. राजश्री डी. कटके यांनी यावेळी रुग्णालयाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. 1886 पासून कार्यरत असलेल्या या कामा रुग्णालयास 126 वर्षे पूर्ण झाली आहेत. सुरुवातीला 68 खाटा असलेल्या या रुग्णालयात आता 505 खाटा आहेत. आर्थिकदृष्टया दुर्बल अशा सर्व रुग्णांना अद्ययावत कर्करोग उपचार सेवा येथे उपलब्ध होत आहे. विभागीय कर्करोग उपचार केंद्र अशी ओळख या रुग्णालयास मिळावी या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्रीमती कटके यांनी यावेळी सांगितले.
या सोहळयास आमदार श्रीमती ॲनी शेखर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. पी. एच. शिनगारे, नगरसेवक गणेश सानप, डॉक्टर्स, परिचारिका तसेच वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

कैंसर इलाज का केंद्र बनेगा कामा हॉस्पिटल


जन्मजात दोष निवारणासाठी…


Wednesday 4 November 2015

Yemeni Woman gets Tumour Removed at Cama Hospital Mumbai.



मायभूमीने दिला पुनर्जन्म!

मुंबई - पोटात वेदनांचा कल्लोळ... प्रत्येक क्षण युगासारखा. जीवघेण्या वेदनांनी विव्हळत एक महिला 40 वर्षांनी येमेनहून भारतमातेच्या कुशीत आली. शेवटचा श्‍वास या मायदेशात घेण्याची इच्छा तिच्या मनात होती. इथल्या भूमीवर पाय ठेवताच तिला आश्‍वासक वाटले. विमानतळावरून ती थेट कामा रुग्णालयात दाखल झाली. डॉक्‍टरांनी तिच्यावर अवघड शस्त्रक्रिया केली आणि तिचा पुनर्जन्म झाला!

येमेनमधील डॉक्‍टरांनी केलेल्या अर्धवट शस्त्रक्रियेमुळे गर्भाशयाचा कर्करोग झालेल्या या महिलेच्या पोटात वेदनांचा आगडोंब उसळत होता. कामा रुग्णालयात शस्त्रक्रिया करून गर्भाशय पूर्णपणे काढून टाकण्यात आले आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. खुर्शिद सय्यद अहमद अली (वय 62) हिची ही कहाणी आहे. लग्न झाल्यानंतर ती येमेनला गेली होती. तिचे पती हमीद इब्राहिम तिथे हॉटेलमध्ये काम करतात. दोन वर्षांपासून खुर्शिदच्या पोटात दुखत होते आणि अंगावरून जात होते. येमेनमधील सरकारी रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गर्भाशयाचा कर्करोग झाल्याने गर्भाशय काढून टाकावे लागणार होते. ही शस्त्रक्रिया इतकी अवघड होती की तेथील डॉक्‍टरांनी ती अर्ध्यावरच सोडून दिली. तिला घरी पाठवले. शस्त्रक्रिया अर्धवट झाली आहे, याची तिला कल्पना देण्यात आली होती. शस्त्रक्रियेमुळे तिचे अंगावरून जाणे थांबले; परंतु तिच्या पोटातील असह्य वेदना बंद होत नव्हत्या. खासगी रुग्णालयात महागडे उपचार करून घेण्याइतकी तिची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. नातेवाईकांनी तिला मुंबईला बोलावले. मुंबईतील कामा रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. "सिटी स्कॅन' केल्यावर येमेनमधील डॉक्‍टरांनी गर्भाशयाचा काही भाग तसाच ठेवल्याचे दिसले. मूत्राशय, आतडी आणि आसपासच्या भागांत तो झाकून गेला होता. त्यामुळे पोटात असह्य वेदना होत होत्या. कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. राजश्री कटके यांनी ही अवघड शस्त्रक्रिया केली आणि तिच्या वेदना थांबल्या. अंडाशय, फिलोपाईन ट्यूब, गर्भाशयाचा राहिलेला भाग, इतर अनावश्‍यक आणि हानिकारक पेशी आता काढून टाकण्यात आल्या आहेत, असे डॉ. कटके यांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतर करण्यात आलेल्या हिस्टोपॅथोलॉजीमध्ये खुर्शिदच्या पोटात आता कर्करोगाचे टिश्‍यू नसल्याचे स्पष्ट झाल्याने तिच्या जीवाला असलेला धोका टळला आहे, असेही त्यांनी सांगितले. रुग्णाची तीव्र इच्छाशक्ती आणि डॉक्‍टरांवर असलेल्या विश्‍वासामुळेच ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी झाली, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

मैं अभी खुश हूँ! लग्नानंतर 40 वर्षे येमेनमध्ये राहिलेल्या खुर्शिद यांना उपचारांसाठी प्रथमच आपल्या मातृभूमीत यावे लागले. मुंबईत पाय ठेवण्याआधी त्या मानसिकदृष्ट्या दुर्बळ झाल्या होत्या. येमेनमधील युद्धामुळे तेथे जगणेही अशक्‍य झाले आहे. भारतात आले नसते तर जगलेच नसते. हा माझा पुनर्जन्म आहे, असे त्यांनी सांगितले. मी आता खुश आहे, असे म्हणताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.